
नांदेड, 06 मे (हिं.स.)। भारताच्या प्रथम डिजिटल जनगणना २०२७ मोहिमेला सुरुवात झाली असून महापालिका क्षेत्रातील स्वगणनेचा शुभारंभ महापौर यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी महापालिकेच्या 'स्व-गणना' उपक्रमांतर्गत त्यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी स्वतःची माहिती नोंदवून या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला आहे.
या प्रसंगी भोकर मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, क्षेत्रीय अधिकारी रमेश चवरे, कनिष्ठ अभियंता रविंद्र सरपाते आदी उपस्थित होते. खा. चव्हाण यांनी जनगणनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, शहराच्या भविष्यातील नियोजन आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नांदेडकरांनी या पहिल्या डिजिटल जनगणनेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. स्व-गणनेमुळे वेळेची बचत होईल आणि अचूक माहिती संकलित करण्यास मदत होईल. विकासाच्या नियोजनासाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis