
छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। फुलंब्री येथील गट क्रमांक ३०९ मध्ये लांडग्याच्याहल्ल्यात सात शेळ्या दगावल्या, तर एक शेळी गंभीर जखमी झाली. या घटनेत शेतकरी किशोर शिवाजी नागरे यांचे एक लाखाचे नुकसान झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागरे यांच्या शेळ्या लोखंडी जाळीच्या कुंपणात सुरक्षित बांधलेल्या असतानाही लांडग्याने जाळीच्या खालून आत शिरत हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेळ्यांचा आवाज ऐकून नागरे यांना जाग आली. त्यांनी तत्काळ धाव घेतल्याने एक शेळी वाचविता आली; मात्र तीही जखमी आहे. आठपैकी सात शेळ्या दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
वन विभागाचे अधिकारी शेख यांनी घटनास्थळ पंचनामा केला. तसेच बाबरा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेळ्यांचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis