
नाशिक, 06 मे (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर उभारले जाणार असून, त्यासाठीची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला.
नाशिक येथील हॉटेल ताज गेट वे येथे झालेल्या ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’ दरम्यान हे हस्तांतरण करण्यात आले. या परिषदेत एकूण 300 हून अधिक सामंजस्य करार (MoUs) झाले असून, सुमारे 13,190 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
या क्लस्टरमुळे आदिवासी भागातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिक आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. या प्रकल्पासाठी आदिवासी विकास विभागाने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती
सन 2026 मध्ये नाशिक जिल्ह्यात एकूण 301 सामंजस्य करारांतून सुमारे 13,189 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 32,487 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. या करारांपैकी काही दस्तऐवजांचे हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या गुंतवणुकीमुळे नाशिक हे भविष्यात उद्योगांसाठी प्रमुख केंद्र (next destination) म्हणून उदयास येईल. उद्योजकांना परवानग्या आणि अडचणी सोडवण्यासाठी ‘मैत्री’ या एकल पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
विविध मोठे गुंतवणूक प्रकल्प
या परिषदेत अनेक मोठ्या गुंतवणुकींची घोषणा झाली, त्यामध्ये
वर्ल्ड ट्रेड सेंटर, नाशिक – 750 कोटी रुपये
सह्याद्री फार्म्स – 457.2 कोटी रुपये
दिलीप टेक्सटाइल्स – 200 कोटी रुपये
ट्रायडंट ॲग्रो एक्स्पोर्ट्स – 119.85 कोटी रुपये
वेस्टइन वाइनयार्ड रिसोर्ट – 400 कोटी रुपये (600 रोजगार संधी)
तसेच CSR अंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे 28 कोटी रुपयांचा शाश्वत जलशुद्धीकरण प्रकल्प राबवला जाणार आहे.
या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.नाशिकमध्ये होणाऱ्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV