
नवी दिल्ली , 06 मे (हिं.स.)।तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आज हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “गेल्या वर्षी भारतातून पवित्र बौद्ध अवशेष व्हिएतनामला पाठवण्यात आले होते, तेव्हा दीड कोटीहून अधिक लोकांनी त्यांचे दर्शन घेतले. आपण चंपा सभ्यतेच्या पांडुलिपींचे डिजिटल स्वरूपात जतन करू आणि ही अमूल्य परंपरा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवू.”
ते पुढे म्हणाले की, “एक दशकापूर्वी माझ्या व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान व्हिएतनाम हा आसियानमध्ये भारताचा पहिला ‘सर्वसमावेशक सामरिक भागीदार’ बनला होता. त्यानंतर आपल्या संबंधांमध्ये सर्व क्षेत्रांत वेगाने प्रगती झाली आहे. आपल्या संस्कृतींबरोबरच व्यापार, तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्रातील संबंधही अधिक मजबूत झाले आहेत. या भक्कम पायावर पुढे जात आज आपण आपल्या संबंधांना ‘आधुनिक सर्वसमावेशक सामरिक भागीदारी’च्या स्तरावर नेत आहोत.” गेल्या दशकात भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन १६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी हैदराबाद हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष लाम यांच्यासोबत बैठक घेतली. त्याआधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले, ज्यातून त्यांच्या भारतातील पहिल्या राजकीय दौऱ्याची सुरुवात झाली.
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष यांचे स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हा समारंभ दोन्ही देशांमधील वाढत्या सामरिक भागीदारीचे प्रतीक होता. स्वागत सोहळ्यात मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भारत आणि व्हिएतनामचे राष्ट्रीय ध्वज फडकवले.
राष्ट्राध्यक्ष तो लाम मंगळवारी भारतात दाखल झाले आणि सर्वप्रथम बोधगया येथे जाऊन महाबोधी मंदिरात पूजा केली. बिहारमध्ये त्यांचे स्वागत मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केले. त्यानंतर ते दिल्लीत आले, जिथे विमानतळावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यात द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींचा समावेश असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याही त्यांची स्वतंत्र भेट घेणार आहेत. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांची भेट घेणार आहेत.
औपचारिक बैठकींपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील मजबूत भागीदारीवर चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानुसार हा दौरा विशेष आहे, कारण भारत आणि व्हिएतनाम त्यांच्या सामरिक भागीदारीची १० वर्षे पूर्ण करत आहेत. तो लाम ७ मेपर्यंत भारतात राहणार असून ते व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिवही आहेत.
या दौऱ्यात ते मुंबईलाही भेट देणार असून, तेथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये आयोजित व्यावसायिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि आर्थिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी चर्चा करतील. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दीर्घकाळापासून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असून, ते आता मजबूत सामरिक भागीदारीत रूपांतरित झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode