
- शिंदे सेनेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली, 17 जून (हिं.स.) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. त्याला लोकसभा अध्यक्षांनी मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती समोर येत आहे. यामध्ये संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई) यांचा समावेश आहे. आता ठाकरे गटाकडे अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे खासदार राहिले आहेत.
काल, मंगळवार रात्रीपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीमध्ये ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी या सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांसमोर बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. दरम्यान खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दिल्लीत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असून लोकसभा अध्यक्षांसमोर बंडखोरांना अपात्र कसे ठरवता येईल, याची रणनीती आखत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु होती. मात्र, दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला नव्हता. अखेर 10 जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींंशी चर्चा करुन या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला. यानंतर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यानंतर ऑपरेशन टायगरला खऱ्या अर्थाने वेग आला होता.
धक्कादायक आणि घृणास्पद - संजय राऊत
या नाट्यमय घडामोडींची कुणकुण लागताच उबाठाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही ट्वीट करत या फुटीला एकप्रकारे दुजोरा दिला आहे. राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे! दरम्यान राऊत यांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, कोणाला जायचे असेल, तर ते राजीनामा देऊन जाऊ शकतात. आमच्या खासदारांबाबत असे अहवाल समोर आल्यास, त्यांनी त्याचे खंडन केले पाहिजे. यावेळी महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही.
दरम्यान ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं आहे की, फुटीर गटाला मान्यता देऊ नका. कायदेशीर तरतुदी काय आहेत? त्यावरही चर्चा केली आहे. बंडखोर खासदारांपैकी कुणाचीही आमची भेट किंवा चर्चा झालेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी