बीसीसीआय आयपीएल २०२७ हंगाम नियोजित वेळेआधी सुरू करण्याच्या विचारात
नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये असलेल्या तीव्र उष्णतेपासून आणि बदलत्या हवामानापासून क्रिकेटपटू आणि प्रेक्षकांचे संरक्षण करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ब
आयपीएल ट्रॉफी संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये असलेल्या तीव्र उष्णतेपासून आणि बदलत्या हवामानापासून क्रिकेटपटू आणि प्रेक्षकांचे संरक्षण करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीग नियोजित वेळेपेक्षा थोडी लवकर सुरू करण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. मंडळाचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, बीसीसीआय १० मार्च ते १५ मे या कालावधीत भविष्यातील आयपीएल हंगामांचे नियोजन करत आहे.

बीसीसीआय सचिवांनी वेळापत्रकातील बदलांविषयी माहिती दिली, पण त्याचबरोबर हेही स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि निर्बंधांमुळे आयपीएल सामन्यांची संख्या वाढवली जाणार नाही. सामन्यांची एकूण संख्या ७४ इतकीच राहील आणि सध्या ती ९४ पर्यंत वाढवण्याची कोणतीही योजना नाही. साधारणपणे, आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि मे महिन्याच्या अगदी शेवटपर्यंत चालते, पण सैकिया यांचा विश्वास आहे की स्पर्धा थोडी लवकर सुरू केल्याने मैदानातील क्रिकेटपटूंना आणि स्टेडियममध्ये पैसे देऊन येणाऱ्या प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळेल.

देवजित सैकिया यांनी या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, या वर्षी आयपीएल २८ किंवा २९ मार्चच्या सुमारास सुरू झाली आणि ३१ मे रोजी संपली. आम्ही यावर सातत्याने चर्चा करत आहोत की, स्पर्धेच्या शेवटच्या दिवसांमध्ये, १५ मे नंतर, देशाच्या अनेक भागांमध्ये अचानक पाऊस किंवा मान्सूनपूर्व हंगाम सुरू होतो, ज्यामुळे सामन्यांवर परिणाम होतो. दुसरीकडे, मे महिन्याच्या अखेरीस उष्णताही वाढते. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीसाठी चांगले नाही आणि स्टँडमध्ये सामने पाहणाऱ्या चाहत्यांसाठीही आरामदायक नाही.

सैकिया यांनी पुढे सांगितले की, मे महिन्याच्या अखेरीस अपेक्षित असलेल्या वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक अंदाजे दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्याच्या रणनीतीवर बीसीसीआय काम करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्याऐवजी मार्चच्या सुरुवातीला हलवता येईल का, जेणेकरून हंगाम मे महिन्याच्या मध्यापर्यंत आरामात संपू शकेल, यावर बीसीसीआय आणि आयपीएल नियामक परिषद यांच्यात चर्चा सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande