

रायगड, 18 जून (हिं.स.)।कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मौजे नेरळ व कर्जत तालुक्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका ऑटो रिक्षाची कागदपत्रे कालबाह्य झाल्याचे समोर आले असून, संबंधित वाहन अद्याप प्रवाशांची वाहतूक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. स्वतःला स्थानिक समजून ग्राहकांशी उद्धटपणे व उरमटपणे वागत असून उपलब्ध माहितीनुसार MH46BD3315 क्रमांकाच्या ऑटो रिक्षाचे विमा (Insurance) आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUCC) यांची मुदत अनुक्रमे 27 व 28 फेब्रुवारी 2025 रोजी संपलेली दिसून येत आहे.
वाहनाची नोंदणी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात असून ते प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाणारे तीन चाकी वाहन आहे.
अशा परिस्थितीत विमा व प्रदूषण प्रमाणपत्र नसताना वाहन रस्त्यावर धावत असल्यास प्रवाशांच्या तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.वाहतूक नियमांनुसार वैध विमा व प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे हा कायद्याचा भंग मानला जातो. अपघात झाल्यास प्रवासी आणि तृतीय पक्षाला नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच प्रदूषण प्रमाणपत्र नसल्याने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित वाहनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांकडे केली आहे. नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, संबंधित वाहनचालकाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. परिवहन विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन वाहनाची कागदपत्रे व परवान्यांची पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)