

रायगड, 20 जून (हिं.स.) : पेण तालुक्यातील खरोशी येथील प्रवाशाचा अलिबाग–पेण मार्गावरील धरमतर पुलाजवळ झालेल्या भीषण रिक्षा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या अपघातात चालकासह आणखी दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धरमतर ब्रिज परिसरातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या कन्व्हेयर बेल्टखाली हा अपघात झाला. रिक्षाचालक कृष्णा जगन्नाथ घरत (वय 40, रा. खरोशी) हा मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत होता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी होऊन हा अपघात घडला.या अपघातात रिक्षामधील संतोष किसन घरत (वय 47, रा. खरोशी) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर गजानन वसंत माळी (वय 41) आणि चालक कृष्णा घरत हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वडखळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी जखमी गजानन माळी यांच्या तक्रारीवरून चालक कृष्णा घरत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक सध्या उपचाराधीन असल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सांगळे करत आहेत
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)