
लातूर, 20 जून (हिं.स.)। मांजरा परिवारातील अग्रणी असलेल्या विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी (ता. जि.
लातूर) या कारखान्याने गळीत हंगाम 2025–26 साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत रु.
3171 प्रति मे.टन असा अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. तसेच अंतिम हप्त्यापोटी रु.321 प्रति मे.टन प्रमाणे ऊस
बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन तथा माजी
आमदार वैजनाथराव शिंदे आणि कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
गाळप झालेल्या ऊसाला कारखान्याने यापूर्वीच प्रति मे. टन 2850/- रुपये प्रमाणे बील अदा केले असून, सध्या
खरीप पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे मशागत, पेरणी, बियाणे, खते आदींसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज
भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेत कारखान्याने उच्चांकी ऊस दर जाहीर करुन
अंतिम हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, कारखान्याचे संस्थापक आमदार अमित
विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि
कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हिताचा विचार
करून प्रति मे. टन 3171/- रुपये प्रमाणे उच्चांकी ऊस दर अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हंगामातील उल्लेखनीय कामगिरी
गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने ६,५१,४३१.२३६ मे.टन उसाचे गाळप केले. यात १२.२१ टक्के
सरासरी साखर उतारा मिळाला असून, ७,१४,४७० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तसेच कारखान्याने ४
कोटी ७८ लाख ८० हजार ६०० युनिट वीज निर्मिती करून यातील २ कोटी ८२ लाख युनिट वीज निर्यात केली
आहे. डिस्टीलरी प्रकल्पातून १ कोटी ०१ लाख लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे.
सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या खंबीर नेतृत्वाखाली कारखाना सातत्याने प्रगतीपथावर
असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्चांकी ऊस दर देण्याची आपली उज्ज्वल परंपरा कारखान्याने कायम राखली आहे.
कारखान्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विश्वासाला साजेसे कार्य केले असल्याने सभासद व ऊस उत्पादक
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis