
अमरावती, 20 जून (हिं.स.)
विदर्भातील विशेषतःअमरावती विभागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, विभागातील ९ प्रमुख मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ३५.२१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. २८८ विभागातील एकूण प्रकल्पांमधील सरासरी जलसाठा ३०.६३ टक्क्यांवर घसरला आहे. जून महिना निम्मा सरला तरी दमदार पावसाने दडी मारल्यामुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांवर जलसंकटाचे सावट गडद झाले आहे.
विभागातील ९ मोठ्या प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता १३९९.९२ दशलक्ष घनमीटर (दलघमी) आहे, ज्यामध्ये सध्या ४९२.९४ दलघमी (३५.२१ टक्के) साठा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात २४६.५५ दलघमी म्हणजेच ४३.७१ टक्के साठा असून तो मागील वर्षाच्या (४३.४० टक्के) तुलनेत किंचित जास्त आहे. वान (अकोला) या प्रकल्पात ४३.३७ टक्के साठा असून अकोला जिल्ह्याला यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खडकपूर्णा (बुलढाणा) प्रकल्पाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. जलाशयाची पातळी ५१५.०० मीटरवर पोहोचली असून उपयुक्त साठा शून्य झाला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या प्रकल्पाने तळ गाठला आहे. अरुणावती प्रकल्पात ३६.९९ टक्के, पेनटाकळी ३४.४८ टक्के, पुस प्रकल्प ३२.३९ टक्के, बेंबळा २९.१३ टक्के तर काटेपूर्णा प्रकल्पात केवळ २१.०१ टक्के साठा शिल्लक आहे. विभागातील २७ मध्यम प्रकल्पांचा विचार केल्यास, तिथेही स्थिती फारशी आशादायक नाही. मध्यमप्रकल्पांमध्ये सध्या ३४.८४ टक्के (२६८.८६ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा प्रकल्पात सर्वाधिक ७६.२१ टक्के साठा आहे, तर गर्गा प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे बुलढाण्यातील पलढग प्रकल्पात केवळ १.२० टक्के पाणी शिल्लक आहे. दुसरीकडे, विभागातील २५२ लघु प्रकल्पांमध्ये अवघा २०.२७टक्के साठा शिल्लक आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी