
सोलापूर, 20 जून (हि.स.) : श्री संत मुक्ताबाई संस्थान, श्री क्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) यांच्या वतीने 318 व्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान 24 जून रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर येथील जुन्या मंदिरातून होणार आहे.
हा पालखी सोहळा सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास करत 29 दिवसांच्या पायी वारीनंतर 22 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. या मार्गक्रमणात पालखी जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे.
प्रवासादरम्यान 20 जुलै रोजी पालखीचा मुक्काम माढा येथे असणार आहे. त्यानंतर 22 जुलै रोजी पालखीचे पंढरपुरात आगमन होऊन श्री संत मुक्ताबाई मठ, दत्त घाट येथे मुक्काम होणार आहे. याच दिवशी दुपारी 4 वाजता श्री संत मुक्ताबाई यांच्या आजेगुरू श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याशी भेट होणार आहे. त्यानंतर पादुकांचे चंद्रभागा स्नान व पंढरपूर प्रवेश होईल.
तसेच 24 जुलै रोजी वाखरी येथे विविध संतांच्या पालखी सोहळ्यांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत सोपानदेव, श्री संत एकनाथ, श्री संत नामदेव आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचा समावेश आहे. या भेटीसाठी मुक्ताबाई पालखी सकाळी 11 वाजता प्रस्थान करणार आहे.वारकरी परंपरेतील या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण वारी मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड