
नांदेड, 21 जून (हिं.स.)। हवामान अनुकूल शेती आणि संतुलित खत व्यवस्थापनावर मौजे सुगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी व आत्मा (ATMA), महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे सुगाव (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे “खेती बचाव अभियान” अंतर्गत विशेष शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी 'Climate Resilient' (हवामान अनुकूल) शेती आणि खतांचा संतुलित वापर याविषयी शेतकऱ्यांमध्ये व्यापक जागरूकता निर्माण करणे हा होता.
या प्रसंगी केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. प्रियांका खोले (कृषी अभियांत्रिकी), डॉ. निहाल मुल्ला (पशुसंवर्धन शास्त्र) आणि कृषी विभागाचे श्री. बी. एस. जायभाय व इतर अधिकाऱ्यांनी उपस्थितांना सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने मृदा व जलसंधारण उपाययोजना, ब्रॉड बेड अँड फरो (BBF) तंत्रज्ञान, पीक अवशेष व्यवस्थापन, सुधारित वाणांची निवड, बीजप्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, गांडूळखत निर्मिती आणि शेणखत प्रक्रियेची शास्त्रीय माहिती देण्यात आली.
हवामानातील बदलांमुळे शेतीवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी विशेष भर देण्यात आला, तसेच एल-निनो परिस्थितीमध्ये पशुधनाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याबद्दलही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतीची उत्पादकता, लवचिकता आणि दीर्घकालीन शाश्वतता वाढवण्यासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांनी पटवून दिले. या कार्यक्रमात गावातील ३० शेतकऱ्यांनी उपस्थित राहून चर्चासत्रात अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवला. डॉ. प्रियांका खोले आणि डॉ. निहाल मुल्ला तसेच कृषी विभागाचे श्री. बी. एस. जायभाय व इतर मान्यवर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis