गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले
रत्नागिरी, 21 जून (हिं.स.) |गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राहिलेल्या चारही तरुणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. पोलीस, कोस्टगार्ड, जीवरक्षक, मच्छीमार आणि स्थानिक नाग
दुर्घटनेविषयी माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अन्य अधिकारी


रत्नागिरी, 21 जून (हिं.स.) |गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राहिलेल्या चारही तरुणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.

पोलीस, कोस्टगार्ड, जीवरक्षक, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त शोधमोहीमेनंतर सर्व मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे गणपतीपुळे परिसरासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

शनिवारी, दि. २० जून रोजी झालेल्या या दुर्घटनेत बुडालेल्या पाच जणांपैकी प्रेम दीपक आदमाने (१९) याचा मृतदेह काल सापडला होता. आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचे मृतदेह आज सापडले. हे सर्व युवक बिडकीन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी होते.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासन, कोस्टगार्ड, जीवरक्षक पथक तसेच स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि भरती-ओहोटीच्या आव्हानांवर मात करत सलग शोधमोहीम राबविण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्व युवकांचे मृतदेह शोधण्यात यश आले.

शोधमोहिमेदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर तसेच जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मोहिमेचा आढावा घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande