

रायगड, 21 जून (हिं.स.)। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सावरोली टोलनाक्याजवळ चार अज्ञात मुखवटाधारी इसमांनी ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण करून रोख रक्कम व कागदपत्रांसह ५४ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास सावरोली गाव हद्दीतील सावरोली टोलनाक्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर मुंबई लेनवर हा प्रकार घडला. फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ हे ट्रक क्रमांक केएल ५९ एए २२१२ मधून प्रवास करत होते. वॉशरूमसाठी ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून तिघे खाली उतरले असता, तोंडाला मास्क बांधलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांना गाठले.
आरोपींनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून जबरदस्तीने रोख रक्कम, कागदपत्रे आणि अन्य साहित्य असा एकूण ५४ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४८/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)