

रायगड, 21 जून (हिं.स.)। अलिबाग : निरोगी, तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, ॲड. निहा राऊत, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, क्रीडा अधिकारी सुचिता ढमाले, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, तसेच विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत योगाचे महत्त्व अधोरेखित केल्यानंतर २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. योग, प्राणायाम, ध्यान आणि आसनांमुळे मानसिक एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणावाचा सामना करावा लागत असल्याने नियमित योगाभ्यासाची गरज अधिक वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले.
योगामुळे शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते. नियमित योगासनांमुळे शरीराला ऊर्जा मिळते, मनःशांती लाभते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनीही उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत नियमित योग करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात स्पर्धा विश्व अकॅडमीचा विद्यार्थी सौरभ समीर वर्तक याची भारतीय सैन्य दलात, तर समीक्षा तांडेल हिची नवी मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)