
नंदुरबार, 22 जून (हिं.स.) : ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु असून अक्राणी तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर केलेली नाहीत. शासनाच्या वेबसाईटवर लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढील 3 दिवसांत आपली कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन अक्राणीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे. तालुक्यातील 10 हजार 100 शेतकऱ्यांची माहिती आतापर्यंत जमा करण्यात आली आहे. मात्र, अजूनही प्रामुख्याने 590 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. तसेच 244 शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार मॅपिंग नसल्यामुळे त्यांचे शासकीय नुकसान भरपाईचे पेमेंट रिजेक्ट (नाकारले) झाले आहे.ज्या पात्र शेतकऱ्यांचे पेमेंट बँक खात्याच्या समस्येमुळे रिजेक्ट झाले आहे, त्यांनी त्वरित आपल्या संबंधित बँकेत जाऊन आधार मॅपिंग करून घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांनी पुढील 3 दिवसांत ती पूर्ण करून घ्यावी.
उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी पुढील 3 दिवसांच्या आत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी/ग्रामसेवक) यांच्याकडे बँक पासबुकची छायांकित प्रत (बँक तपशीलासह), आधार कार्डची छायांकित प्रत, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ही कागदपत्रे जमा करावीत. यासंदर्भात
30 जून 2026 या अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही माहितीचा विचार केला जाणार नाही. जर एखादा शेतकरी विहित मुदतीत माहिती सादर न केल्यामुळे किंवा ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे लाभापासून वंचित राहिला, तर त्यास सर्वस्वी संबंधित शेतकरीच जबाबदार राहतील, याची गंभीर नोंद घ्यावी, असेही तहसिलदार ऐतवडे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर