
रायगड, 22 जून (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी सादर करण्यात आलेल्या ‘सेंट बॅक’ अर्जांतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ७ जुलै २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाचे सुनिल जाधव यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात असून, यासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळाचा वापर करण्यात येत आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने महत्त्वाचा नियम बदल लागू केला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे.
मात्र, वसतिगृहासाठी अर्ज न करणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृह आणि स्वाधार या दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. समाज कल्याण विभागाने पात्र विद्यार्थ्यांना मुदतवाढीचा लाभ घेऊन अर्जातील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)