
नांदेड, 22 जून (हिं.स.)।
शिवसेनेतील अलीकडील राजकीय घडामोडी आणि बंडाच्या पार्श्वभूमीवर खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रथमच आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळविणे आणि प्रलंबित विकासकामांना गती देणे हेच आपल्या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आष्टीकर म्हणाले की, मतदारसंघातील अनेक महत्त्वाची विकासकामे निधीअभावी रखडली - होती. खासदार निधीतील केवळ पाच कोटी रुपयांत सर्व विकासकामे पूर्ण करणे शक्य नव्हते. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिल्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि विकासाला चालना देणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना मनात होती. याच उद्देशाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पक्षांतराच्या चर्चावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण कोणताही पक्ष सोडलेला नसून 'शिवसेनेतून शिवसेनेतच' आलो आहोत. आपल्या विचारधारेत कोणताही बदल झालेला नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
ठाकरे गटावर टीका करताना आष्टीकर यांनी काही नेत्यांच्या वक्तव्यांतील अतिरेकामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले. 'शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात. त्यामुळे राजकीय विरोधकांनी असंवैधानिक किंवा अवमानकारक भाषा वापरणे टाळावे,' असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis