
सोलापूर, 22 जून (हिं.स.)।
साेलापूर रेल्वे विभाागाने विनातिकीट प्रवास, चुकीच्या तिकीटाचा वापर आणि रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
नव्या नियमानुसार, विनातिकीट प्रवास करताना आढळलेल्या प्रवाशांना आता किमान 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी ही रक्कम 250 रुपये होती.
विनातिकीट प्रवाशांकडून संबंधित प्रवासाचे संपूर्ण भाडे, अतिरिक्त शुल्क आणि किमान 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. दंड भरण्यास नकार दिल्यास संबंधितांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
तसेच, दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील तिकीट वापरताना आढळल्यास संबंधित तिकीट जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, गेल्या मे महिन्यात मध्य रेल्वेने 4 लाख 96 हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे 40.85 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता.
वाढत्या विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि रेल्वेचा महसूल सुरक्षित ठेवण्यासाठी जन विश्वास (दुरुस्ती) कायदा 2026 अंतर्गत रेल्वे कायदा 1989 मधील कलम 137 आणि 138 मध्ये सुधारणा करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड