
सिन्नर, 23 जून, (हिं.स.)। नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-आळेफाटा-चाकण-हडपसर या प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने स्थगिती देत प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने आक्रमक भूमिका घेत येत्या २९ जून रोजी गोंदे फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली आहे.
सिन्नर येथे सोमवारी (दि.२२) पार पडलेल्या रेल्वे कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. बैठकीत नगर जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय संघर्षामुळे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा बळी गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. जनहिताच्या प्रकल्पावर राजकारणाचे सावट पडल्याने सात तालुक्यांच्या विकासाच्या संधी हिरावल्या गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
समितीच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मूळ सरळ मार्गानेच जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात रेल्वे मार्गच रद्द करण्यात आल्याने जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. गेल्या तीन दशकांपासून उत्तर महाराष्ट्रातील जनता या रेल्वे मार्गासाठी संघर्ष करीत आहे. अनेक आंदोलने मुख्यमंत्री यांच्या विनंतीवरून स्थगित करण्यात आली होती. मात्र अखेर प्रकल्प रद्द झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बैठकीस बबन वाजे, हरिभाऊ तांबे, प्रा. राजाराम मुंगसे, सतीश नेहे, रवी मोगल, रामदास खैरनार, आनंदा सालमुठे, रतन पडवळ, मुकेश देशमुख, शरद टरले, अरुण खालकर, नंदू सोनवणे, चंद्रकांत भट्टड, मुरकुटे, सविता कोठ्ठठुरकर, बळीराम दराडे, संजय शिरोळे, रमेश आवटे आदी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV