
सोलापूर, 23 जून (हिं.स.)। सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत नाना देशमुख यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकी दरम्यान जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.निवडणूक प्रचारात मोहिते पाटील गट विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळाला.
उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या समर्थनार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सक्रिय भूमिका घेतली होती.दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर अप्रत्यक्षपणे मोहिते पाटील गटावर टीका करत “ज्यांच्यामुळे ही निवडणूक लागली त्यांना धडा शिकवू” अशी भूमिका मांडली होती. मतदाना दिवशीही त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत “त्यांचा इगो या निवडणुकीनंतर संपेल” अशी प्रतिक्रिया दिली.यावर प्रत्युत्तर देताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी कल्याणशेट्टी यांच्यावर टीका करत ते राजकारणात तुलनेने नवीन असल्याचे सांगत बोचरी टिप्पणी केली होती.निवडणुकीनंतर विजय जल्लोषात बोलताना सचिन कल्याणशेट्टी यांनी विरोधकांवर टीका करत “विरोधकांची जहागिरी संपली असून जनतेने त्यांना योग्य जागा दाखवली आहे” असे म्हटले. तसेच काही गट अजूनही सरंजामशाही मानसिकतेत वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.अक्कलकोट तालुक्यातील स्थानिक राजकीय समीकरणांबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी महायुतीच्या भूमिकेला प्राधान्य देत पक्ष आणि नेतृत्व जिथे सांगेल तिथे एकत्र राहण्याची भूमिका स्पष्ट केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड