
मुंबई, 23 जून, (हिं.स.)। राज्यातील वीजटंचाई, वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्याच्या घटना घडल्या. निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे हे संच बंद पडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्यावेळी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली. राज्याला पुरविला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, यंदा उन्हाळ्यात वीजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असताना महाजनिर्मितीच्या अनेक वीज निर्मिती संचांमध्ये तांत्रिक बिघाड झाले. यामागे निकृष्ट दर्जाचा कोळसा हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे निकृष्ट कोळसा पुरवठा करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, कोळसा पुरवठ्याबाबत केंद्रीय कोळसा मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली असून कोळशाचे योग्य सॅम्पलिंग करण्याबाबत राज्याची भूमिका मांडण्यात आली आहे. कोळसा पुरवठ्याबाबत जे नवीन टेंडर काढले जाईल त्यात निकृष्ट कोळसा पुरवठा करणारे,जे गैरफायदा घेतात ते घेऊ शकणार नाही याची खबरदारी घेतली जाईल .
राज्यातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून वीजनिर्मितीसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का,असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.यावर चंद्रपूर येथे ८०० मेगावॉट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर