
जळगाव, 03 जून (हिं.स.) जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत आज एसपी कार्यालयात एक विशेष संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आल्याने, उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. या बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची सुरक्षा, मालमत्तेचे वाद, कौटुंबिक समस्या, आरोग्याची आपत्कालीन परिस्थिती आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बँक अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून होणारी फसवणूक, केवायसी अपडेट, ओटीपी आणि क्यूआर कोडद्वारे होणारी फसवणूक, तसेच ‘डिजिटल अरेस्ट’ आणि बनावट गुंतवणूक योजना यांसारख्या ऑनलाइन गैरप्रकारांची माहिती देऊन ज्येष्ठांना जागृत करण्यात आले. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक व बँकेची माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. याशिवाय घरफोडी, चोरी व मालमत्तेची फसवणूक टाळण्यासाठी घरगुती मदतनीस किंवा केअरटेकरची योग्य पोलीस पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस आणि शेजाऱ्यांशी संपर्क ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला. ”ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असून त्यांची सुरक्षा व सन्मान ही जळगाव पोलिसांची प्राथमिकता आहे,” अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली. या थेट संवादामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या या लोकाभिमुख आणि संवेदनशीलता जपणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर