तृणमूलचे खा. सुखेंदु शेखर रॉय यांनी पक्ष सोडला; खासदारपदाचाही दिला राजीनामा
कोलकाता/नवी दिल्ली, 08 जून (हिं.स.)। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबरोबरच राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सोमवारी सकाळी दिल्लीहून त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा के
WB TMC MP Sukhendu Sekhar Roy Resigns Party


कोलकाता/नवी दिल्ली, 08 जून (हिं.स.)। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबरोबरच राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सोमवारी सकाळी दिल्लीहून त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आणि आर. जी. कर रुग्णालयातील चर्चेत असलेल्या प्रकरणासह भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पक्षनेतृत्वाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली.

सुखेंदु शेखर रॉय यांनी दावा केला की आर. जी. कर प्रकरणानंतरच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता, जो आता अंमलात आणला आहे. त्यांनी सांगितले की शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये वाढत चाललेला भ्रष्टाचार तसेच जनतेतील वाढता असंतोष यामुळे तृणमूलचा ऱ्हास अपरिहार्य झाला होता.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, भविष्यात ते सक्रिय राजकारणातूनही निवृत्त होण्याचा विचार करू शकतात. त्यांनी आरोप केला की पक्षांतर्गत भ्रष्टाचार टोकाला पोहोचला होता आणि प्रामाणिक नेत्यांना बाजूला ढकलण्यात आले होते. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की तृणमूलचे सर्वच नेते भ्रष्ट नाहीत.

सुखेंदु शेखर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या उत्पन्नाची आणि संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही केली. आर. जी. कर प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की त्यांनी सार्वजनिकरित्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अंतर्गत चौकशीची मागणी केली होती, कारण अजूनही त्यांना वाटते की पुरावे नष्ट करण्यात त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हायला हवी. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या घटनेनंतर दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्याच वेळी त्यांनी ठरवले होते की ते अधिक काळ पक्षात राहणार नाहीत.

विशेष म्हणजे, सोमवारी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी तृणमूल काँग्रेस प्रमुख व माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पक्षाचे महासचिव व लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी दिल्लीत पोहोचले आहेत. बैठकीपूर्वी सुखेंदु शेखर यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूलमध्ये नव्या राजकीय संकटाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत तृणमूलच्या खराब कामगिरीनंतरच सुखेंदु शेखर पक्षाच्या कार्यपद्धतीवर उघडपणे भाष्य करत होते. आर. जी. कर प्रकरणाच्या काळातही त्यांनी भ्रष्टाचार आणि कथित अनियमिततेविरोधात आवाज उठवला होता. मात्र, त्या वेळी त्यांनी पक्ष सोडला नव्हता. सत्तांतरानंतर त्यांनी उघड विरोध नोंदवत ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande