
लातूर, 14 जुलै, (हिं.स.)। वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या उक्तीप्रमाणे निसर्गाचे महत्त्व जपत, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महात्मा गांधी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. अशोक कराड यांनी अहमदपूर ते पंढरपूर अशी 'सायकल वारी' यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. लातूर सायकल क्लबच्या वतीने आयोजित या उपक्रमातून त्यांनी प्रदूषणमुक्त, निर्मल आणि हरित वारीचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
डॉ. अशोक कराड यांनी आपली सायकल वारी दोन दिवसांत पूर्ण करत पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेतले. या प्रवासादरम्यान त्यांनी 'स्वच्छ वारी, सुंदर वारी' असा सामाजिक संदेश देत, सायकलिंगमुळे होणारे आरोग्याचे फायदे आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवले.
डॉ. कराड यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत विचार विकास मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे व सचिव ॲड. पी. डी. कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव सुरेशराव देशमुख, प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. अनिल जाधव, प्रभारी क्रीडा संचालक डॉ. विनोद माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ. अनिल कांबळे, डॉ. यादव सूर्यवंशी, डॉ. के. एन. शिवलकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. कराड यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis