

नाशिक, १४ जुलै (हिं.स.) : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या नियोजनात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कुंभमेळ्याशी संबंधित संवेदनशील स्थळांवरील भूस्खलनाच्या संभाव्य धोक्याचे शास्त्रीय मूल्यमापन करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (जीएसआय) आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्यात २३ जुलै रोजी उच्चस्तरीय तांत्रिक बैठक होणार आहे.
भारतातील शास्त्रज्ञांनी २०२७ मध्ये सुपर एल-निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली असून, त्यामुळे तापमानवाढीसह अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन कुंभमेळा प्राधिकरणाने बहुविध आपत्ती व्यवस्थापन दृष्टिकोन स्वीकारला आहे.
कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती जोखीम व्यवस्थापन आराखड्यात १७ संभाव्य आपत्तींची ओळख करण्यात आली आहे. त्यामध्ये भूस्खलन हा महत्त्वाचा धोका निश्चित करण्यात आला असून, संवेदनशील भागांचे वैज्ञानिक मूल्यमापन करण्यासाठी जीएसआयचे तांत्रिक सहकार्य घेण्यात येत आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाने जीएसआयकडे रॅपिड साइट-स्पेसिफिक लँडस्लाईड असेसमेंट करण्याची विनंती केली आहे. यासोबतच भविष्यातील जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक दीर्घकालीन उपाययोजनांबाबत शिफारशी करण्यासाठी सविस्तर भूवैज्ञानिक अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या अभ्यासासाठी समृद्धी महामार्ग बोगदा, कसारा घाट, हर्सूल रोड (दिंडोरी रोड-त्र्यंबकेश्वर मार्ग), कोळंबिका देवी ट्रस्ट परिसर, नील पर्वत, घोटी-त्र्यंबकेश्वर मार्ग, त्र्यंबकेश्वर-जव्हार मार्ग आणि सापुतारा मार्ग या महत्त्वाच्या स्थळांचा प्राथमिक स्तरावर समावेश करण्यात आला आहे.
आगामी २३ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत स्थळ पाहणीचा आराखडा, भूवैज्ञानिक अभ्यासाची कार्यपद्धती, प्राधान्यक्रम, तज्ज्ञांकडून क्षेत्रीय पाहणी तसेच तातडीच्या आणि दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. या अभ्यासातून मिळणाऱ्या शिफारशींचा उपयोग सुरक्षित वाहतूक मार्ग, पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि कुंभमेळ्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी केला जाणार आहे.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या नियोजनात भाविकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे. हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत असून, संभाव्य धोक्यांचे वेळेपूर्वी वैज्ञानिक मूल्यमापन करून प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जीएसआयच्या तांत्रिक सहकार्यामुळे भूस्खलनाच्या दृष्टीने संवेदनशील स्थळांची अचूक ओळख होईल आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविता येतील. वैज्ञानिक माहिती, तज्ज्ञ संस्थांचा समन्वय आणि दीर्घकालीन नियोजनाच्या आधारे सुरक्षित, सक्षम आणि आपत्ती प्रतिरोधक सिंहस्थ कुंभमेळा उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.-------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV