
परभणी, 14 जुलै, (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रलंबित प्रश्नांबाबत प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने मंगळवार 14 जुलैपासून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. विविध मागण्यांबाबत यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे.
कृती समितीच्या निवेदनानुसार, प्रकल्पग्रस्तांसाठी काढण्यात आलेल्या भरती जाहिरातीस मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठातील कंत्राटी कुशल व अकुशल कामगारांना ठरावानुसार वेतनवाढ व ईएसआय सुविधा लागू कराव्यात, भरती प्रक्रियेतील परीक्षांचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे आणि ज्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांची प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे जिल्हा पुनर्वसन अधिकार्यांकडे प्रलंबित आहेत, त्यांना कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून अर्ज करण्यास परवानगी द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात सुनील रणेर, श्याम रणेर, लक्ष्मणराव शिंदे, सोपान ढगे, गोविंद शिंदे, वैभव शिंदे, सय्यद सादत, गजानन शिंदे, आदिनाथ रणेर, स्वप्निल रणेर, दिपक शिंदे, गोपाळ थोरात, हरिपाल थोरात, कृष्णा मोहिते, रामप्रसाद भालेराव, पुंढलिक शिंदे, शिवाजी रणेर, सदाशिव शिंदे यांच्यासह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis