
नवी दिल्ली, 15 जुलै, (हिं.स.) - आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) २०२७ च्या सत्रापासून लागू होणाऱ्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदलांना मंजुरी दिली आहे. सुधारित स्पर्धा कालावधीने लहान असेल, त्यात अधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग असेल आणि 'स्विस-सिस्टम' पात्रता फेरीचा समावेश असेल.
नवीन स्वरूपामुळे विश्वचषकाचा कालावधी २७ दिवसांवरून १९ दिवसांवर आणला गेला आहे. ही स्पर्धा आता दोन टप्प्यांत खेळली जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात 'स्विस-सिस्टम' स्पर्धांचा समावेश असेल, ज्या 'फास्ट क्लासिकल' वेळेच्या मर्यादेत (४५ मिनिटे + प्रत्येक चालीसाठी ३० सेकंदांची वाढ) खेळल्या जातील. 'ओपन' विश्वचषकात चार 'स्विस पूल्स' (गट) असतील, तर महिला विश्वचषक दोन गटांमध्ये विभागला जाईल. प्रत्येक स्विस स्पर्धा पाच दिवसांत नऊ फेऱ्यांमध्ये खेळली जाईल.
प्रत्येक गटातील अव्वल बुद्धिबळपटू 'नॉकआउट' टप्प्यासाठी पात्र ठरतील. 'ओपन' विश्वचषकात, चारही गटांतील प्रत्येकी अव्वल चार बुद्धिबळपटू (एकूण १६ बुद्धिबळपटू) पात्र ठरतील. महिला विश्वचषकात, दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल आठ बुद्धिबळपटू (एकूण १६ बुद्धिबळपटू) पुढील टप्प्यात जातील.
दुसऱ्या टप्प्यात पारंपरिक 'नॉकआउट' स्वरूप कायम ठेवले जाईल. 'राऊंड ऑफ १६' (अंतिम १६), उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना हे सध्याच्या विश्वचषक स्वरूपात आणि 'क्लासिकल' वेळेच्या मर्यादेत खेळले जातील. स्विस आणि नॉकआउट टप्प्यांच्या मध्ये एक विश्रांतीचा दिवस असेल आणि नॉकआउट टप्प्यात आणखी दोन विश्रांतीचे दिवस असतील.
यापूर्वी, विश्वचषक 'सिंगल-एलिमिनेशन नॉकआउट' स्वरूपात खेळला जात असे, ज्यामध्ये २०६ बुद्धिबळपटू आठ फेऱ्यांमध्ये स्पर्धा करत असत. प्रत्येक फेरी तीन दिवसांची असे; यात दोन 'क्लासिकल' सामने आणि तिसऱ्या दिवशी 'टाय-ब्रेक' सामने होत असत. अव्वल ५० मानांकित बुद्धिबळपटूंना 'बाय' (थेट पुढील फेरीत प्रवेश) मिळत असे, तर ५१ ते २०६ मानांकन असलेले बुद्धिबळपटू पहिल्या फेरीत स्पर्धा करत असत.
नवीन स्वरूपानुसार, 'ओपन' विश्वचषकातील बुद्धिबळपटूची संख्या २०६ वरून २२४ पर्यंत वाढेल, तर महिला विश्वचषकातील बुद्धिबळपटूंची संख्या १०३ वरून १२८ पर्यंत वाढेल. एकूण बक्षीस रक्कम २.६७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून ३.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे.
'स्विस' पात्रता फेरी आणि पारंपरिक 'नॉकआउट' अंतिम टप्पा यांचा मेळ घालून, फिडेचा उद्देश विश्वचषकाची उत्कंठा आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवणे, तसेच प्रत्येक सहभागी बुद्धिबळपटूला अधिक सामने खेळण्याची संधी आणि स्पर्धेचा एकंदरीत उत्तम अनुभव देणे हा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे