
रत्नागिरी, 15 जुलै (हिं.स.) । नुकत्याच झालेल्या लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीतील महिला धावपटू मानसी मराठे यांनी ३५ किमीमध्ये द्वितीय, वाटद खंडाळा येथील धावपटू अजित किंजळे याने ३५ किमीमध्ये द्वितीय आणि गुहागरमधील अनंत तानकर यांनी दहा किमीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव उंचावले.
रत्नागिरीतील ३० जण लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये, १० जण कुडाळ मान्सून मॅरेथॉनमध्ये व ५० जणांनी सायकलवारीमध्ये सहभाग घेऊन फिटनेस चळवळीला गती दिली.
लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये वाटद खंडाळा येथील किंजळेवाडीतील अजित अनंत किंजळे याने यश मिळवले. पुरुषांच्या ३१ ते ४० वयोगटामध्ये ४ तास २२ मिनिटांत धाव पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला. बी. कॉमची पदवीधारक असलेला बांधकाम व आंबा व्यवसाय करत असलेला अजित किंजळे कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमुळे नियमित सराव करू लागला. २०२४ पासून कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यापासून त्याने आतापर्यंत विविध मॅरेथॉन स्पर्धांत यश मिळवले आहे.
पोमेंडी बुद्रुक येथील सौ. मानसी मराठे यांनी ३५ किमी अंतर ४ तास ३१ मिनीटांत पार करून महिलांच्या ४१ ते ५० या वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यापूर्वी त्यांनी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्येही सुयश मिळवले आहे.
लोणावळा मॅरेथॉनच्या ४१ ते ५० या वयोगटात १० किमीच्या अंतर ४५ मिनीटांत पार करून गुहागरच्या अनंत तानकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यापूर्वी तानकर यांनी कोकण कोस्टल मॅरेथॉन तसेच इतर अनेक मॅरेथॉन आणि सायकलिंगच्या स्पर्धांमध्ये सुयश मिळवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी