
परभणी, 02 जुलै (हिं.स.)।
परभणी तालुक्यातील असोला गाव पांदणमुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील विविध पांदण रस्त्यांच्या विकासकामांचे लोकार्पण भारतीय जनता पक्षाचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विकासकामांतर्गत असोला–परभणी, असोला–मुरुंबा, असोला–कारेगाव, मुरुंबा रोड ते गट क्रमांक २२७ तसेच तट्टूजवळील पांदण ते नागोराव भरोसे यांच्या शेतापर्यंतच्या मार्गांसह गावातील सर्व प्रमुख पांदण रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली. या कामांमुळे असोला गाव अधिकृतपणे पांदणमुक्त झाले आहे. कार्यक्रमास सरपंच उमाकांत भरोसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दशरथ जावळे, माजी उपसरपंच व्यंकटी जावळे, पोलीस पाटील पंढरी रिक्षे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जावळे, बाळासाहेब जावळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या पांदण रस्त्यांच्या कामांमुळे जवळपास ७५० शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कायमस्वरूपी, सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध झाल्याने शेतीमालाच्या वाहतुकीला गती मिळणार असून शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे. ग्रामविकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. यावेळी या विकासकामासाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत, या उपक्रमामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis