
डोंबिवली, 02 जुलै (हिं.स.)।पूर्वीपासून चौदा गावाची परिस्थिती खूप खराब आहे. आता नगरसेविका या नात्याने नवी मुंबई महानगरपालिकेत याविषयी भूमिका लावून धरत आहे. आज नवी मुंबई महानगरपालिका तसेच नवी मुंबई शहर विकसित शहर आहे. शहराचा योग्य विकास झाला आहे. निधीही मोठ्या प्रमाणात मिळतो असे असताना आम्हाला मात्र मूलभूत व पायाभूत सुविधांपासून का डावललं जात असा रोखठोक प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका सविता सांगळे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिका परिक्षेत्रातील पिंपरी गावात शिवसेना माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम होता त्यावेळी सांगळे बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना नगरसेविका सविता सांगळे, गणेश जेपाल (उपतालुका प्रमुख), सुखदेव पाटिल (उप विभाग प्रमुख), भरत भोईर (माजी पंचायत समिती सदस्य), किसन जाधव (विभाग प्रमुख), जयरी पाटिल (विभाग प्रमुख), सावळाराम पाटिल, संदीप पाटिल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या माध्यमातून पदाधिकारी व शिवसैनिक वर्षाचे ३६५ दिवस समाजपयोगी कार्यासाठी सतत कार्यरत असतात. शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि फक्त ३० टक्के राजकारण करत आणि हे सर्व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला धरून होत असते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अनेक वर्षांपासून विद्यार्थांना शैक्षणिक मदत म्हणून मोफत शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करीत असतात. त्यानुसार आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र वह्या वाटप कार्यक्रम होत आहे. त्याचाच भाग म्हणून आज विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात आले असे यावेळी उप विभाग प्रमुख सुखदेव पाटिल म्हणाले.
शिवसेनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम केले जात असले तरी सध्या पावसाचे दिवस आहेत कुठे गटार तुंबले, पावसामुळे पूर, शाळेमध्ये पाणी साचला आहे अशा समस्या असतील तर ताबडतोब सांगा. सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात येईल. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे वह्यांच वाटप होत आहे. पण मोफत वह्याचे वाटप हा एक फक्त उपक्रम नाही, वह्या आणि पुस्तक हे समाजाला आणि देशाला घडविणाऱ्या गोष्टी आहेत असे मत माजी पंचायत समिती सदस्य भरत भोईर यांनी मांडले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi