
पुणे, 02 जुलै (हिं.स.) । शहरातील मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेने बावधन येथे सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारलेला इन्सिनेटर (कारकस दहन प्रकल्प) गेल्या तीन वर्षांपासून वापराविना बंद आहे.
वन विभागाने आपल्या जागेवर मृत प्राण्यांचे दहन करण्यास नकार दिल्याने हा प्रकल्प आता बोपोडी येथील सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) परिसरात स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या स्थलांतरासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, बोपोडी परिसरात मोठी लोकवस्ती असल्याने तेथेही स्थानिक नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास महापालिकेचा दीड कोटी रुपयांचा मूळ खर्च आणि स्थलांतराचा अतिरिक्त खर्चही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या शहरातील मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नायडू रुग्णालयाच्या आवारात दोन इन्सिनेटर कार्यरत आहेत. मात्र, त्यांची क्षमता अपुरी पडत असल्याने महापालिकेने बावधन, मुंढवा आणि कात्रज प्राणी संग्रहालय परिसरात तीन नवीन इन्सिनेटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत बावधन येथील वन विभागाच्या जागेत अत्याधुनिक दहन प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, आवश्यक परवानग्या आणि वन विभागाच्या आक्षेपांमुळे हा प्रकल्प आजतागायत सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता तो बोपोडी येथील एसटीपीच्या जागेत हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु