
परभणी, 02 जुलै (हिं.स.)।
आषाढी वारी पालखी सोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षित, सुखकर आणि सुविधायुक्त प्रवासासाठी व्यापक नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी विविध विभागांना समन्वयाने काम करून वारकऱ्यांना आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशव्दारे सूचित केले आहे.या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस विभागप्रमख उपस्थित होते.जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून पंढरपूरकडे जाणाऱ्या सुमारे 43 दिंड्या परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहेत. दि. 4 जुलैपासून प्रमुख दींड्या परभणी जिल्हयात दाखल होणार आहे. तर दि. 17 जुलैपर्यंत विविध दिंड्यांचे आगमन सुरू राहणार आहे. श्रीक्षेत्र त्रिधारा, रोकड हनुमान मंदिर (नवा मोंढा), परभणी, दैठणा, गंगाखेड येथे वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार आहे.प्रमुख पालख्यांचे आगमन - श्री संत गजानन महाराज (शेगाव), श्री संत गुलाबराव महाराज (चांदूर बाजार) तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान (कौंडिण्यपूर-तिवसा) यांच्या पालख्या परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून त्यांच्या स्वागतासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.सर्व विभागांना जबाबदाऱ्या निश्चित - जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, महापालिका, महावितरण, परिवहन, अन्न व औषध प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल आदी विभागांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.वारकऱ्यांसाठी उपलब्ध होणार या सुविधा - दिंडी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियोजन. मुक्कामस्थळी स्वच्छ पिण्याचे पाणी, निवारा व वॉटरप्रूफ तंबू. महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे व आंघोळीची व्यवस्था. फिरती आरोग्य पथके, रुग्णवाहिका, डॉक्टर व औषधांची उपलब्धता. तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्था. डास प्रतिबंधक फवारणी, स्वच्छता मोहीम व साथीच्या रोगांवर नियंत्रण. दिंडी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, खड्डे बुजविणे. आवश्यक ठिकाणी वीजपुरवठा, तात्पुरती वीज जोडणी आणि विद्युत सुरक्षेची व्यवस्था. एसटी महामंडळाकडून भाविकांसाठी विशेष बसची सुविधा. अन्न व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी. 24x7 नियंत्रण कक्ष, आपत्कालीन संपर्क व्यवस्था व बचाव पथके सज्ज ठेवण्यात येणार आहे.प्रशासनाचे निर्देश - आषाढी वारीदरम्यान सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वारी घडवून आणण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis