
गडचिरोली., 02 जुलै (हिं.स.)
जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरूडजवळील पोहार नदीच्या पुलाच्या पोच मार्गाचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला असून आज दोन ट्रक नदीजवळ पोच मार्गावर पलटल्याची घटना घडली आहे.
विशेष म्हणजे, कुरूड(पोहार) व शिवणी (पोटफोडी) नदीजवळ पोच मार्गाचे काम रखडल्यामुळे सर्व अवजड वाहतूक जुन्या पुलावरून सुरू आहे. या पुलांना अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येत असून, सातत्याने होत असलेल्या जड वाहतुकीमुळे पुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले आहे. मात्र अद्यापही पोच मार्गाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पोहार व पोटफोडी नदीवरील पुलाच्या पोच मार्गाचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, तसेच जुन्या पुलांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती अथवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond