
पुणे, 02 जुलै (हिं.स.)।
राज्य परीक्षा परिषदेने पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रद्द केलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आता सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे नव्याने प्रश्नसंच तयार करावा लागणार असून, त्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (२८ जून) राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच २७ जून रोजी भिवंडी येथे पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्याने परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि परीक्षा पूर्णपणे पारदर्शक वातावरणात घेता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले होते.
परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यभरातील सुमारे सहा लाख उमेदवारांमध्ये परीक्षेच्या नव्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पेपरफुटीनंतर मूळ प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने त्यातील प्रश्न पुन्हा वापरणे शक्य नसल्याचे परीक्षा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संपूर्णपणे नव्याने प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी लागणार आहे.
याशिवाय, भविष्यात टीईटी परीक्षा पारंपरिक ऑफलाइन पद्धतीऐवजी ऑनलाइन घेण्याचा पर्याय स्वीकारावा का, याबाबतही परीक्षा परिषदेत विचारमंथन सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु