
ठाणे, 02 जुलै (हिं.स.) : महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेत ८-९ वर्षांपासून अग्निशमन दलात कार्यरत १२५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आर्यन पंप अॅण्ड एनवायरो सोलुशन प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून महापालिकेच्या अग्निशमन दलात प्रशिक्षणार्थी अग्निशमन जवान म्हणून १२५ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना सध्या दरमहा २२ हजार ५०० रुपयांपर्यंत वेतन मिळत असून, त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. या काळात त्यांनी ठाणे शहराबरोबरच अग्निशमन दलाची कार्यपद्धती आत्मसात केली आहे. त्यांना सेवेत कायम ठेवल्यास अग्निशमन दलाचा फायदा होईल, असे मत नगरसेविका नम्रता कोळी यांनी मांडले आहे.
महापालिकेच्या अग्निशमन दलात ६५८ पदे रिक्त असून, गावदेवी मंडईतील आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने ६०१ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेत स्थान देण्याची मागणी कंत्राटी १२५ कर्मचाऱ्यांनी केली आहे. अग्निशमन दलाच्या भरतीत स्थान न मिळाल्यास संबंधित कर्मचारी बेरोजगार होण्याची भीती आहे. त्याचबरोबर त्यांची ८-९ वर्षांची मेहनतही वाया जाईल. तरी या कर्मचाऱ्यांप्रती सहानुभुतीचा दृष्टीकोन ठेवून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या भरतीत कायमस्वरुपी नोकरी द्यावी, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी पत्रात केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर