‘विकसित भारत–जी-राम-जी’ मुळे गाव-खेड्यांचा सर्वांगीण आर्थिक विकास होईल : जिल्हाधिकारी डॉ. राठोड
कोल्हापूर, 2 जुलै, (हिं.स.)। विकसित भारत–जी-राम-जी हा केवळ रोजगार देणारा कार्यक्रम नसून कामाची कायदेशीर हमी देणारा कायदा आहे. पात्र व्यक्तींना विहित कालावधीत काम उपलब्ध करून देता आले नाही, तर त्यांना भरपाई मिळणार आहे. या कायद्यामुळे गाव-खेड्यांचा स
विकसित भारत–जी-राम-जी’ बैठक


कोल्हापूर, 2 जुलै, (हिं.स.)। विकसित भारत–जी-राम-जी हा केवळ रोजगार देणारा कार्यक्रम नसून कामाची कायदेशीर हमी देणारा कायदा आहे. पात्र व्यक्तींना विहित कालावधीत काम उपलब्ध करून देता आले नाही, तर त्यांना भरपाई मिळणार आहे. या कायद्यामुळे गाव-खेड्यांचा सर्वांगीण आर्थिक विकास साधला जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विकसित भारत–जी-राम-जी’ ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, विकसित भारताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करावा. पारदर्शकता हे या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य असून विकसित भारताच्या मोहिमेत प्रत्येक गावाने खारीचा वाटा उचलावा.

जिल्हास्तरीय कार्यक्रमात दीप प्रज्वलित करून तसेच योजनेच्या फलकाचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात सिंचन विहिरी व रेशीम लागवडीच्या कामांचे वितरण आदेश लाभार्थ्यांना देण्यात आले. तसेच मागील मनरेगा योजनेत सलग १०० दिवस काम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी सांगितले की, गावाच्या गरजांनुसार आणि विकासाच्या दृष्टीकोनातून प्रत्येक ग्रामपंचायतीने विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करावा. नव्या विकासकामांसह देखभाल-दुरुस्तीची कामेही आता घेता येणार असून, यापूर्वी सुरू असलेली कामे नव्या योजनेअंतर्गत पूर्ण केली जाणार आहेत. गावातील अस्तित्वात असलेल्या योजनांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात येणार असून लाभार्थी निवडीत मागास घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे. योजनेत १२५ दिवसांची रोजगार हमी, ग्रामसभेद्वारे विकसित ग्रामपंचायत आराखडा (VGPP), काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता, विविध योजनांचा समन्वय, मजुरी वेळेत मिळण्याची हमी व विलंब झाल्यास भरपाई तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शक अंमलबजावणी अशा महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत.

उपजिल्हाधिकारी (रोहयो) शक्ती कदम यांनी योजनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. जिल्हा कृषी अधिकारी अजित खताळ यांनी सादरीकरणातून योजनेतील बदल मांडले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, जिल्हा कृषी अधिकारी अजित खताळ, जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे, गट विकास अधिकारी (नरेगा) अविनाश कामत यांच्यासह गावस्तरीय लाभार्थी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, रोजगार सेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत झाडांची रोपे देऊन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande