
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठ्यांच्या इतिहासातील पहिला पंतप्रधान म्हणजे पेशवा बाजीराव यांनी स्वतःच्या हयातीत 40 लढाया मराठा साम्राज्य विस्तारासाठी लढल्या व जिंकल्या. त्यामुळे त्यांच्या अजिंक्य पराक्रमाने स्वराज्याचे रुपांतर मराठा साम्राज्यात झाले, असे प्रतिपादन जगन्नाथ लडकत (पुणे) यांनी केले.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत संस्था व आत्मोन्नती प्रतिष्ठान परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात ‘अपराजित योध्दा बाजीराव पेशवे आणि पालखेडची ऐतिहासिक लढाई’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर हभप माधवराव आजेगांवकर, जगन्नाथ लडकत, अमृत संस्थेचे राज्य समन्वयक दिपक जोशी, ब्राह्मण महासंघाचे विलास कौसडीकर, शंकर आजेगांवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना लडकत म्हणाले की, बाजीरावाने आपल्या पराक्रमाची दहशत देशभर पसरवली होती. त्यामुळे शत्रू असलेल्या निजामानेसुध्दा किताब देऊन बाजीरावांचा सन्मान केला होता. तसेच इंग्रज अधिकार्यांनी सव्वा दोनशे वर्षानंतर बाजीरावांचा इतिहास पुस्तक रुपाने लिहिला. स्वतःच्या वयाच्या 13 व्या वर्षापासून 40 व्या वर्षापर्यंत 40 युध्द जिंकणार्या बाजीरावाचे मोठे शस्त्र म्हणजे त्यांच्या युध्दाची गती होती. त्या गतीच्या बळावरच त्यांनी पालखेडला निजामाचा पराभव केला. जगातील पहिल्या दहा वैशिष्ट्यपूर्ण युध्दात बाजीरावांच्या युध्दकौशल्याचा उल्लेख जगाच्या इतिहासाने घेतला आहे.
आजही पालखेडच्या लढाईचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील विद्यार्थी येतात. अठरापगड जातीचे सरदार आणि सैन्य सांभाळून एकाही पेशव्याने आतापर्यंत छत्रपतींच्या गादीशी गद्दारी केली नाही. अशा बाजीरावांची 18 ऑगस्टला 326 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करुन जेनझीच्या हातात बाजीरावांचे चरित्र द्या, असे प्रतिपादन लडकत यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने श्रोत्यांची तसेच लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis