
अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
क्रांतीदीनी मशाल पेटवून आंदोलनाला सुरुवात..
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून तिवसा तहसील कार्यालय परिसरात बेमुदत अन्नत्याग व साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
गुरुदेव भक्तांच्या नेतृत्वाखाली क्रांतीज्योत व मशाल पेटवून आंदोलनाचा शुभारंभ करण्यात आला. ‘राष्ट्रसंतांना भारतरत्न, एकच लक्ष’ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.भारतरत्न देण्याची घोषणा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी मुकूंद पूनसे, जयकुमार बोके, रमेशराव बोके, हैबतराव गाडगे, शफीक शाह, मनोहराव साबळे व जगणराव साबळे उपोषणाला बसले आहेत.आंदोलनाचे संचालन विजयराव बोके यांनी केले. यावेळी प्रा. प्रकाश बोके, प्रा. नरेंद्र राऊत, महादेव गरपवार, कार्यवाहक प्रशांत कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी