

दोघांनी पोहून वाचवला जीव
भोपाळ, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सारंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी मुसळधार पावसादरम्यान पडाना बायपासवरील झिरी नाल्यावरील निर्माणाधीन पुलावर देवास जिल्ह्यातील सतवास परिसरातून कडलावद येथे जात असलेली ईको गाडी पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. कारमध्ये एकाच गावातील 11 जण प्रवास करत होते. त्यापैकी आतापर्यंत सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. दोघांनी पोहून आपला जीव वाचवला, तर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.
ही गाडी सतवास येथील धांसड गावातील रहिवासी मुकेश सिंह चौहान यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. कारमध्ये तीन पुरुष, चार महिला आणि चार मुले होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश सिंह आणि हुकुम सिंह यांनी अपघातानंतर कसाबसा पोहत नाल्यातून बाहेर येत आपला जीव वाचवला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कार पाहता पाहता नाल्यात बुडाली.
अपघाताची माहिती मिळताच एसडीएम रोहित बम्होरे, एसडीओपी अरविंद सिंह, पोलीस ठाणे प्रभारी राहुल रघुवंशी यांच्यासह प्रशासन आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. एसडीईआरएफच्या बचाव पथकाने बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या मदतीने कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. बचावकार्यादरम्यान सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पडाना येथील झिरी नाल्यावर सुमारे 30 फूट लांबीचा पूल निर्माणाधीन आहे. मुसळधार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत होते. त्याचवेळी कार तेथून जात असताना ती पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात सापडली. पोलिसांनी सापडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी सारंगपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. एसडीईआरएफचे पथक उर्वरित दोन बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहे.
धनसाड गावचे माजी सरपंच ओमप्रकाश पटेल यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार शंकर, विशाल, सागरबाई, पूजा, रेणू, हुकुम, वंशिका, राजवीर, जसप्रीत, आनंद आणि चालक मुकेश हे गाडीमध्ये होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule