
यवतमाळ, 10 ऑगस्ट (हिं.स.)शहराचे खड्डेयुक्त जीवघेणे रस्ते बुजविण्यासाठी पालिकेने हाती घेतलेले काम बघितल्यास आधीचेच खड्डे बरे होते, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कंत्राटदारांकडून नियमांची ऐसीतैसी केल्या जात असून खड्ड्यात मुरुमाऐवजी चक्क मातीच भरल्या जात असल्याची ओरड नागरिकांची आहे. यामुळे अरुणोदय सोसायटी येथून मातीयुक्त आलेला मुरुम परत घेऊन जाण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे.
रस्त्यावरील खड्डे डांबरी पॅचेस करून बुजविणे अपेक्षित होते, मात्र त्यापूर्वी मुरूमकाम करून धूळफेक करण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. खड्ड्यात मुरूमाऐवजी माती भरण्याचे षडयंत्र आखले. मुरूम सांगून माती टाकण्याच्या या मलमपट्टीने रस्ते अधिकच चिखलमय होऊन धोकादायक तेव्हढेच जीवघेणे बनले आहेत. अरुणोदय सोसायटीमध्ये नागरिकांनी या कामाला विरोध केला, मुरूम टाका माती नको, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने तंत्रज्ञाने माती परत उचलून नेली. मात्र, बाजोरिया नगर तसेच अँग्लो हिंदी चौक, विदर्भ हाउसिंग सोसायटी, वीर वामनराव चौक मार्गावर अशाच पद्धतीने सुरू असलेल्या उरफाट्या कामांमुळे खड्डे बुजवतात, पावसामुळे रस्त्यावर चिखल होत आहे.
हे खड्डे बुजवण्याचे काम नगरपरिषदेने भर पावसात हाती घेतले. पालिका अभियंत्यांसमोरच कंत्राटदराने भल्या मोठ्या खड्ड्यात मुरुमाऐवजी मातीच भरली. हे थातूरमातूर काम तासाभराने आलेल्या पावसात चिखलमय झाले. खड्डे पुन्हा जैसे ते बनले, त्यात अनेक जणांचे वाहने घसरून अपघात घडू लागले. या अशा ‘अभिनव’ प्रयोगामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल सुरूच आहे. ही अशी कामाची ‘अर्थपूर्ण’ मलमपट्टीची पद्धत शहरात ठिकठिकाणी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी