
शाळा, महाविद्यालये व बसस्थानक परिसरात बंदोबस्त वाढविण्याची सरपंच संघटनेची मागणी
लातूर, ११ ऑगस्ट (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील शाळा, महाविद्यालये तसेच बसस्थानक परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस गस्त आणि बंदोबस्त वाढविण्यात यावा, अशी मागणी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील नामवाड यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जळकोट पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विनाकारण फिरणारे, मोठ्या आवाजात मोटारसायकली चालविणारे तसेच विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
केवळ निवेदन स्वीकारून थांबू नये, तर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी आणि आवश्यक ती प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते सचिन केंद्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, मंगरूळचे माजी सरपंच महताब बेग, सरपंच सुनील भालेराव, हावगी स्वामी यांच्यासह तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis