
लातूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। खरीप हंगामाची सुरुवात आशादायी झाल्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला, तरी तालुक्यात अपेक्षित दमदार पाऊस झालेला नाही. सुरुवातीच्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने शेतातील कोवळी पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याने यंदाच्या उत्पादनाबर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
देवणी तालुक्यात ३५ हजार ८९७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून, यंदाच्या खरीप हंगामात ३१ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याची माहिती आहे. उर्वरित ३१ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांत पेरण्या केल्या आहेत. पेरणी झाल्यानंतर महिन्याहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, पिकांची अपेक्षित वाढ होत नसून अनेक ठिकाणी पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत केवळ २४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्याचा बराचसा कालावधी उलटत असतानाही नदी-नाले, विहिरी, कूपनलिका तसेच साठवण तलावांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक गावांमध्ये जलस्रोत अद्यापही तळ गाठत असल्याने आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि पशुधनासाठीआवश्यक पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.
हिरव्या चाऱ्याचीही टंचाई; पशुधन सांभाळण्याचे आव्हान-पावसाने ओढ दिल्याचा फटका केवळ पिकांनाच बसलेला नाही, तर पशुपालक शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. माळरानांवर पुरेसे गवत उगवलेले नसल्याने जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जनावरांना चारा कुठून आणायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. उपलब्ध चाऱ्याचा साठा संपत चालल्याने पशुधन वाच्चचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis