
वर्धा 12 ऑगस्ट (हिं.स.)। आश्रमशाळा अन् धोका या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून ओळखल्या जातात. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील हिरापूर (तळणी) येथील आश्रमशाळा सध्याच्या स्थितीत या धोक्यापासून दूर असल्याचे दिसून आले. विजयगोपालपासून ५ किमी अंतरावर असलेल्या या शाळेत प्रवेश परवानगीनेच मिळत असल्याचे दिसून आले.
येथे गेल्यानंतर शाळेचे मुख्य द्वार बंद असल्याचे दिसून आले. येथे असलेल्या चौकिदाराला भेटीचे प्रयोजन सांगितल्यानंतर त्याने कार्यालयात जावून परवानगी आणली. त्यानंतरच द्वार उघडण्यात आले. त्यानंतर आत गेल्यानंतर मुख्यध्यापकाच्या कार्यालयाकडे गेल्यानंतर त्यांनीच सर्व शाळा दाखविली. शाळेला आणि वसतीगृहाला असलेल्या संरक्षक भिंतींमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांना आत प्रवेश नसल्याचे दिसून आले. शिवाय येथे विद्यार्थ्यांना झोपण्याकरिता खाटांची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे या आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शाळेतच वास्तव्यास असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्याच्या दिवसात जंगलभागात असलेल्या आश्रमशाळांत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गडचिरोली येथे तीन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. यामुळे जिल्ह्यातील आश्रम शाळा कितपत सुरक्षीत याची तपासणी 'सकाळ'च्या माध्यमातून करण्यात आली. हिरापूर तळणी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता शाळेत उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले. येथे निवासी असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि जीवित हानीची विशेष बाब म्हणून तेथील शिक्षक वृंद, कर्मचारी आणि तेथील मुख्याध्यापकांकडून काळजी घेण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. कारण पावसाळ्यात मुलांच्या आरोग्याला धोका तसेच सरपटणाऱ्या प्राण्यापासून जीवित हानीचा सुद्धा धोका संभवतो. त्या दृष्टीने या शाळेत संपूर्ण सुविधा करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात १० आश्रम शाळा
वर्धा जिल्ह्यात आदिवासी विभागाच्या पाच आणि समाजकल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या पाच अशा एकूण १० आश्रमशाळा आहेत. एकूण पटसंख्या २, ६१८ इतकी आहे. या आश्रम शाळांत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता पूर्ण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्वच शाळांना संरक्षक भिंत. तळणी येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या झोपण्याकरिता खाटांची सोय. नारा येथील शाळेत खिडक्यांना दिसल्या सुरक्षा जाळ्या. गत पाच ते सहा वर्षांत जिल्ह्यातील एकाही आश्रमशाळेत सर्पदंश किंवा इतर घटनांची नोंद नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी