
मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची काहीशी उघडीप पाहायला मिळत असली तरी आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात सक्रिय असलेल्या मान्सून ट्रफचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १७ ऑगस्टपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात 17 ऑगस्टपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असून, पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाल्यास नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याबरोबरच दरड कोसळणे, भूस्खलन आणि रस्त्यांवर पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घाटमार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्येही पावसाची रिपरिप कायम राहण्याची शक्यता आहे. शहरात अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. काही भागांत पावसाचा जोर वाढल्यास सखल भागात पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही पुढील काही दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मध्यम ते चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, या पावसाचा खरीप पिकांना फायदा होऊ शकतो. मात्र, अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात 17 ऑगस्ट रोजी काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा सुरळीत ठेवावा आणि हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतीची कामे करावीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule