सीजेपीचे सौरव दास यांच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून चौकशी: केंद्र सरकारवर धमकावल्याचा आरोप
नवी दिल्ली , 13 ऑगस्ट (हिं.स.)।कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे सहसंयोजक सौरव दास यांनी आरोप केला आहे की, पुडुचेरी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. ‘केंद्र सरकारच्या सांगण्यावरून’ त्यांच्या कुटुंबाला घाबरवले जात असल्य
सीजेपीचे सौरव दास यांच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून चौकशी: केंद्र सरकारवर धमकावल्याचा आरोप


नवी दिल्ली , 13 ऑगस्ट (हिं.स.)।कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे सहसंयोजक सौरव दास यांनी आरोप केला आहे की, पुडुचेरी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. ‘केंद्र सरकारच्या सांगण्यावरून’ त्यांच्या कुटुंबाला घाबरवले जात असल्याचा दावा दास यांनी केला आहे.

सौरव दास यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांना त्यांच्या घरी जाण्याचे आदेश कोणी दिले? त्यामागचे कारण काय होते? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. दास यांनी लिहिले, “दोन तासांपूर्वी पुडुचेरी पोलीस माझ्या घरी पोहोचले आणि कुटुंबीयांना अनेक प्रश्न विचारले. पुडुचेरी पोलीस आम्हाला त्रास का देत आहेत? याचे आदेश कोणी दिले आणि कोणत्या उद्देशाने? ही कायदेशीर प्रक्रिया आहे का?”पुढे त्यांनी आरोप केला की, पुडुचेरीतील भाजपच्या समर्थनाने चालणारे सरकार त्यांच्या कुटुंबाला ‘घाबरवत’ आहे. ही कारवाई केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारच्या स्वभावाला साजेशी नसल्याचेही त्यांनी म्हटले. ते म्हणाले, “पुडुचेरीतील भाजप सरकार माझ्या कुटुंबाला का घाबरवत आहे? पुडुचेरी सरकारचा स्वभाव असा नाही. हे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून केले जात आहे.”

या कारवाईचा उद्देश त्यांना घाबरवून गप्प बसवणे असल्याचा आरोपही दास यांनी केला. मात्र, त्यामुळे आपण राजकीय कार्य सुरू ठेवण्यापासून मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दास यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “जर मला घाबरवून गप्प बसवणे हा यामागचा उद्देश असेल, तर ते यशस्वी होणार नाही. मी घाबरून मागे हटणार नाही. यामुळे अधिक चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा संकल्प आणखी मजबूत होईल. अशी व्यवस्था, ज्यामध्ये पोलीस कायद्याचे पालन करतील, गुंडांसारखे वर्तन करणार नाहीत.” पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन केलेल्या चौकशीच्या आधारावरही दास यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले, “केंद्र सरकारच्या सांगण्यावरून पुडुचेरी सरकार माझ्या कुटुंबाला का घाबरवत आहे? याचे आदेश कोणी दिले आणि कोणत्या उद्देशाने? ही कायदेशीर प्रक्रिया आहे का?”

दास यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुडुचेरी दौऱ्यावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी लिहिले, “अमित शहा फक्त दोन दिवसांपूर्वी पुडुचेरीमध्ये होते. तेथे त्यांनी पुडुचेरीचे गृहमंत्री आणि नायब राज्यपाल यांची भेट घेतली. नायब राज्यपालांना काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये मोदींचे ‘डोळे आणि कान’ म्हणून ओळखले जात होते. या बैठकीत कुटुंबाला घाबरवण्याची ही रणनीती आखण्यात आली होती का?” दरम्यान, पुडुचेरी पोलिसांनी स्पष्ट केले की, त्यांच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीच्या घरी दिलेली भेट ही स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नियमित सुरक्षा व्यवस्थेचा भाग होती.

पोलिसांनी सांगितले की, व्हीआयपींच्या ये-जा होणाऱ्या परिसरातील घरे आणि हॉटेल्समध्ये चौकशी केली जात होती. पुडुचेरीमध्ये अलीकडे कोणतीही नवीन व्यक्ती आली आहे किंवा कुठे वास्तव्यास आहे का, याची माहिती घेणे हा या चौकशीचा उद्देश होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही चौकशी नियमित स्वरूपाची होती आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande