
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सोलापूरला येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी तब्बल सात तास उशिरा धावत आहे. यामुळे आतील प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत. बुधवारी रात्री दहा वाजून 40 मिनिटाने सुटलेली ही गाडी गुरुवारी सकाळी सात वाजता सोलापूरला पोहोचते मात्र सकाळी पावणे दहा वाजले तरी पुणे स्टेशनला पण पोहोचली नव्हती.
अनेक बोगी मधील टॉयलेट मधील पाणी सुद्धा संपले आहे. त्यामुळे तर प्रवाशाची मोठी पंचायत झाल्याचे दिसून आले. लोणावळा ते पुणे येण्यासाठी या गाडीला तब्बल चार तास लागले. अनेक ठिकाणी ही गाडी अर्धा तास थांबत असल्याचे पाहायला मिळाले.
गाडी पुणे स्टेशन वर थांबल्यावर प्रवासी खाद्य पदार्थांच्या दुकानावर अक्षरशः तुटून पडल्याचे दिसून आले.
रेल्वे एवढी लेट का झाली याचे कारण समजू शकले नाही. सिद्धेश्वर एक्सप्रेस सोबत इतर अनेक रेल्वे गाड्या सुद्धा उशिरा धावत असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मूलभूत गरजा याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड