
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आणि ‘सगेसोयरे’ अध्यादेशासह सातारा, कोल्हापूर व पुणे गॅझेटियरची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. २९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी मराठा बांधवांनी सज्ज राहावे. अंतरवली सराटी हे आंदोलनाचे मुख्य केंद्र असले, तरी गरज भासल्यास मराठा समाज ताकदीने मुंबईच्या दिशेने कूच करेल, असेही त्यांनी सांगितले.
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे सकल मराठा समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सभेत जरांगे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार तसेच राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली.शासनाकडे सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे देण्यात येणारी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे किंवा ती रोखण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. या प्रकरणात सरकारने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भूमिकेवरही जरांगे यांनी टीका केली. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांच्या विरोधात काम करणाऱ्या आणि आंदोलनापासून दूर राहणाऱ्या मराठा नेत्यांवर समाजाने लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.२९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी तयारी करावी, असे आवाहन करत जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड