

भरत गोगावले यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची चर्चा
रायगड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नसून, आता या मुद्द्यावर राजकीय नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा मान राज्याचे मंत्री भरत गोगावले यांना मिळाला. मात्र, त्यांना अद्याप रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना असल्याचे बोलले जात आहे.
रायगडच्या राजकारणात भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रमुख नेते मानले जातात. महाड विधानसभा मतदारसंघातून सलग निवडून आलेल्या गोगावले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने पालकमंत्रीपदाबाबतही निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त केली जात होती.
मात्र, गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला असला तरी पालकमंत्रीपदाबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील विकासकामे, प्रशासनाशी समन्वय आणि स्थानिक प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्री असणे आवश्यक असल्याची भूमिका समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पालकमंत्रीपदाच्या निर्णयामागे महायुतीतील राजकीय समीकरणे तसेच पक्षांतर्गत चर्चा महत्त्वाची ठरत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे गोगावले यांच्याकडे स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाची जबाबदारी सोपविण्यात आली असली, तरी पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे.
आता राज्य सरकारकडून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अधिकृत निर्णय कधी जाहीर होतो आणि भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते की अन्य नेत्याची नियुक्ती केली जाते, याकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)