
रायगड, १७ ऑगस्ट (हिं.स.) | अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या प्रदीर्घ राजकीय तिढ्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने सोमवारी, १७ ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले अनेक महिन्यांपासून आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे असलेल्या या पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले होते.
विशेषतः भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्षामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला. गोगावले यांनी यापूर्वी तटकरे यांच्यावर पालकमंत्रिपदाच्या आपल्या दाव्याला विरोध केल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आरोप फेटाळण्यात आले होते.
रायगडचे पालकमंत्रिपद मिळाल्याने गोगावले यांच्या राजकीय भूमिकेला मोठे बळ मिळाले आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गोगावले हे रायगडच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याने जिल्ह्यातील विकासकामांना अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासकीय बैठका, विकास आराखडे, निधीचे नियोजन तसेच विविध शासकीय विभागांमधील समन्वय साधण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे गोगावले यांच्या नियुक्तीनंतर दोन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी झालेली नियुक्ती जिल्ह्याच्या राजकारणासाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)